गुरुवार, २० जुलै, २०२३


समाजमाध्यमांवर धोरण म्हणून एखादी भाषा वापरताना तीचा योग्य वापर खूप महत्त्वाचा. भाषेचं व्याकरण, धाटणी जपणं, त्यात इतर भाषांची अनावश्यक भेसळ करणं आवर्जून टाळणं यातून त्या लिखाणाचा आणि लेखकाचा अस्सलपणा दिसतो. त्याचे कष्ट, विषयावरची पकड लक्षात येते. सोपी अर्थवाही वाक्यरचना आणि नेटकी मांडणी हे लेखनाचे श्वास आहेत.

 दुसऱ्या भाषेतील शब्द वापरूच नये असं नाही. पण ते शब्द वापरताना, खरंच याची इथे गरज आहे का, याला त्या भाषेत कुठला शब्द आहे का हे प्रश्न परत परत विचारून अपरिहार्य परिस्थितीतच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरावा असं मला वाटतं. दुसऱ्या भाषेतील शब्द आपण वापरतो तेव्हा आपण वाचकाला ती भाषा येते हे गृहीत धरतो. या गृहीत धरण्याला माझा आक्षेप आहे. 

कुणालाही गृहीत धरू नये हे व्यवस्थापन आणि संज्ञापनातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. इतर भाषांतले अगदी साधे साधे शब्दसुद्धा एखाद्याला माहिती नसण्याची शक्यता आपण कधीच नाकारू शकत नाही. (साध्या रोजच्या आयुष्यात वाचता वाचता 4 वेळा शब्दकोश पाहावा लागत असेल किंवा परभाषिक शब्द असल्याने त्यांचे अर्थ लागत नसतील तर त्या लेखनाचा काय उपयोग?)

आज आशय लेखन हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. त्यामुळे कोणालाही 'गृहीत' न धरता, सर्वांना समजेल असे समतोल,
लेखन करणं, चुकीचे पायंडे पडू न देणं ही एक आशय लेखक म्हणून सदैव आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं.

- तेजाली चंद्रकांत शहासने 
२१ जून २०२३