गुवाहाटीचा विमानतळ नेटका आहे. छोटासा, आटोपशीर, स्वच्छ. उतरल्यावर पहिला प्रश्न होता आता पुढे कसं जायचं शिलॉंगला. अचानक ठरवलेल्या प्रवासाची ही एक गंमत असते. पुढे काय घडणार काहीच माहिती नसतं. आपण आणि आपली निर्णयक्षमता. विमानतळावर मेघालय टुरिझमचा स्टॉल होता, पण तो अजून उघडला नव्हता. बसने जायचं की टॅक्सी/ओला याचा विचार चालू होता. दोन मुली प्रवास करत असल्या की सुरक्षिततेचा विचार सर्वांत आधी. शेवटी काळ, काम वेगाचं गणित मांडून आम्ही दोघींनी टॅक्सी करायचं ठरवलं. सहज चेक केल तर ओला आऊटस्टेशन दाखवत होतं. सरळ बुक केली, पंधरा मिनिटांत गाडी हजर आणि आम्ही सुटलो शिलॉंगच्या दिशेने. गुवाहाटीवरून शिलॉंगला जाण्यासाठी बस, टॅक्सी कोणताही पर्याय निवडा, पोटातल पाणी हलणार नाही इतका रस्ता मख्खन आहे. घाटाघाटातून, हिरव्या गच्च झाडीतून वर वर जात आपण शिलॉंगला पोचतो. शिलॉंगच्या साधारण ३० किमी आधी उमरॉई इथे शिलॉंगचं विमानतळ आहे आणि तिथेच बारपानी किंवा उमईयाम जलाशय आहे. मेघालयातल्या स्थलदर्शनाची सुरुवात इथून होते. आमच्या ड्रायव्हरने मुद्दाम तिथे गाडी थांबवली. आपल्या मॅप्रोजवळ वाटत तसंच वाटलं थोडंसं, पण अनुभव आणखी भव्य आणि श्रीमंत. थोडावेळ थांबलो, पावसाची बुरबुर सुरू झाली तसे निघालो, थेट हॉटेलात पोचलो. दुपार झालेली. निवांत जेवलो. आमच्या हॉटेल मालकाने आमच्यासाठी गाडी सांगून ठेवली होती. एक नवा अनुभव आमची परीक्षा बघायला सज्ज होता.
ड्रायव्हर, थोडे वयस्कर काका होते. आम्ही निघालो तसं हॉटेल मालकाने ड्रायव्हरला त्यांच्या भाषेत पटापट सूचना दिल्या, संध्याकाळपर्यंत फिरवून हॉटेलमध्ये सोडायला सांगितलं. नंतर आमच्या लक्षात आल की त्यांना इंग्लिश, हिंदी, मराठी यातली कुठलीच भाषा येतं नाही. सुरुवातीला आमच्या हिंदीला त्यांनी जुजबी उत्तर दिली. पण आम्ही काय सांगतो हेच त्यांना कळेना. आम्हाला तिथल्या टुरीझम ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची होती, त्यांना काही केल्या झेपेना. शेवटी त्यांना म्हटलं, थांबा. बाजूने जाणाऱ्या एका मुलाला थांबवलं. त्याला विचारलं, बाबा, इंग्लिश/हिंदी येते? म्हणाला इंग्लिश येते. मग मी त्या मुलाला आणि त्याने त्या काकांना समजवलं आणि एकदाचे त्या ऑफिसमध्ये पोचलो. तिथल्या कर्मचाऱ्यांनी प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली, शंका समाधान केलं. गंगटोकच्या टुरिझम ऑफिसमधला अनुभवही असाच सुखावह होता.
मेघालयमधे जास्त विचार न करता फिरायचं असेल तर मेघालय टुरिझमच्या बसेस तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. शिलॉँगच्या बाजारपेठेतून रोज सकाळी ७-८ च्या सुमारास या बसेस सुटतात, दिवसभर तुम्हाला फिरवून संध्याकाळी परत आणून सोडतात. बससोबत गाईड असतात, ते इंग्रजीतून माहिती देतात. शासनाने ठरवून दिलेले दर आहेत त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न नाही. थेट ऑफिसात जा, शक्यतो आदल्या दिवशी तिकीट काढा कारण बस संख्या मर्यादित असते. सकाळी वेळेत पोहोचा आणि मेघालयभर हुंदडा. शिलॉँगवरून एका दिवसात जाऊन येण्याच्या दृष्टीने या सहली आखलेल्या आहेत. रोज एक या हिशेबाने ५ सहली करत तुमचं मेघालय फिरून होतं. पण दुर्गम भागात आणखीही अनेक अद्भुत ठिकाणं आहेत ज्यांच्यासाठी थोडी पूर्वतयारी आणि नियोजन गरजेचं आहे.
मेघालयात पर्यटनाची प्रमुख आकर्षण म्हणजे तिथले जीवंत ‘मूलसेतू’, तिथल्या गुहा आणि त्यांतील लवणस्तंभ, उमनगोट नदीचं निवळशंख पात्र आणि धबधबे. त्यातही तुम्हाला खासम खास, धाडसी पर्यटन करायचं असेल तर इथल्या महाकाय गुंफा आणि दुर्गम भागातले मूलसेतू तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण जगभरातील काही विशालकाय गुहा मेघालयात आहेत. कधीही न बघितलेललं एक वेगळंच जग या गुहांमध्ये आहे. भारतातल्या सर्वांत लांब १० गुहांपैकी ९ या मेघालयमधे तर १ मिजोरममधे आहे. गुंफा पर्यटन हा तिथला एक महत्त्वाचा उद्योग आहे. पण अर्थात यासाठी प्रशिक्षण, सराव, माहिती खूप गरजेची आहे.
तसंच मूलसेतू; मेघालयामधे जवळपास ६-७ असे सेतू आहेत. त्यातला एक शिलॉंगजवळ आहे. तो तुम्हाला टूरमध्ये दाखवतात. हा सर्वांत सोप्पा आणि त्यामुळे प्रसिद्धही आहे. इथे पर्यटकांची सतत गर्दी असते. पण खरंच त्यातली अद्भुतता बघायची असेल तर दुर्गम भागातले दुमजली सेतू नक्की पाहा. ट्रेकिंग आवडत असेल, सवय असेल तर तुम्ही तिकडे जायलाच हवं. हौशी, वेळेची मर्यादा असलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने मेघालय पर्यटन विभागाने ५ विभाग करून रोज एक विभाग बघता येईल अशा प्रकारे सहली आखल्या आहेत. सोहरा(चेरपुंजी), शिलॉँग, मॉसिनराम (जगातील सर्वांत चिंब ठिकाण, एकेकाळी हा मान चेरपुंजीकडे होता.), मॉवलिननॉंग, आणि नार्तियांग/जोवई असे हे पाच विभाग आहेत. अंतर येऊन जाऊन साधारण १५० ते २०० किमी. पण अंतरावर जाऊ नका, इथल्या वळणांमुळे प्रवास तुमची दमछाक करतात.
मेघालयाचं नियोजन करताना पर्यटनाचा उद्देश नक्की केलात तर पर्यटन स्थळे निवडणं सोपं जाईल. नेहमीचं पर्यटन, गुंफा भ्रमंती आणि मूलसेतूदर्शन यातलं तुम्हाला काय आणि किती हवंय ते ठरवा आणि नियोजन करा. तिथले नयनरम्य धबधबे या पर्यटनातला बोनस. काही खास नियोजनाची गरज नाही. जाता येता वाटेवरच हे भेटतात. अर्थात त्यातही काही मस्ट आहेतच.
पहिला म्हणजे नो का लिकाई, हा भारतातला सर्वांत उंच धबधबा, #चेरपुंजीजवळ आहे. ‘नो का लिकाई’ नावामागे एक करुण कथा आहे. नो का लिकाई म्हणजे ‘लिकाईची उडी’. लिकाई नावाच्या महिलेने पुनर्विवाह केला. तिच्या नवऱ्याला वाटायचं की ही त्याच्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते. त्या रागात त्याने त्या मुलीचा खून केला. इकडे मुलगी सापडत नाही म्हणून ती महिला वेडीपिशी झाली, एक फळांच्या टोपलीत तिला तिची बोटं सापडली. त्या दुखा:त तिने या कड्यावरून उडी घेतली. तिचं नाव या प्रपाताला दिलंय.
आम्ही गेलो तेव्हा पाऊस पडत होता आणि संपूर्ण दरी ढगांनी भरून गेली होती. पावसाळ्याच्या तोंडावर मेघालय पाहायला गेल्याची ही शिक्षा. ड्रायव्हर म्हणाला, जरा थांबू, पाऊस थांबला तर ढग जातील, मग दिसेल तुम्हाला धबधबा. मग काय, थांबलो. धबधबा पाहण्यासाठी इथली व्यवस्था खरंच चांगली आहे. सतत पावसामुळे निसरडं होण्याची शक्यता लक्षात घेऊन नीट बांधीव पदपथ आणि कठडे केलेले आहेत. अलीकडे आपण, पलीकडे धबधबा आणि मध्ये महाकाय दरी असं स्वरूप. तिकडे गेल्यावर तुम्हाला कदाचित वरंध घाटातल्या धबधब्याची आठवण येऊ शकते.
थोडा वेळ तिकडे रेंगळलो, फोटो काढले, ढगांची आणि पावसाची गंमत पाहण्यात अर्धा तास असा उडून गेला. पाऊस कमी झाला आणि वारा सुरू झाला. मी कठड्यापाशीच होते. त्या वाऱ्याने दरीभर पसरलेले ढग उडवून लावले आणि तो प्रपात समोर प्रकटला. अशा धबधब्याला प्रपात हाच शब्द योग्य. धबधबा तसा लडिवाळ वाटतो. इकडून तिकडून टणाटण उड्या मारत जाणाऱ्या मुलासारखा! त्या विशाल गंभीर रूपाला प्रपात हेच नाव योग्य. दूरवर पसरलेल्या खॉंसी पर्वतरांगेच्या पठारावरून पावसाचं पाणी एकत्र येतं इथे प्रपातचं रूप घेतं आणि या कड्यावरून खोल दरीत झेप घेतं. संपूर्ण धबधबा नजरेत साठवताना दमछाक होते. खाली साठलेल्या जलाशयाचं पाणी हिवाळ्यात नीळं तर उन्हाळ्यात हिरवं दिसतं.
आणि या धबधब्याच्या जवळपास एक सुंदर गुहा आहे तिचं नाव आरवा. हे थोडं दूर असल्याने पर्यटक त्या मनाने कमी असतात. मी गेले तेव्हा तर आम्ही दोघीच होतो. छान बांधून काढलेली वाट आपल्याला गुहेपर्यंत नेते. अर्थात चालावं लागतंच, गुहेपर्यंत आणि गुहेच्या आतही. जवळपास ३०० मीटरपर्यंत ही गुहा पसरलेली आहे. सतत पाणी ठिबकून तयार झालेले लवणस्तंभांचे अद्भुत आकार हे या गुहेचं खरं वैशिष्ट्य. ही गुहा आपल्याला अलिबाबाच्या गुहेत नेते. आत एक ऑक्टोपससारखा लवणस्तंभ तयार झाला आहे. एका ठिकाणी चक्क समुद्री जीवांचे जीवाश्म देखील सापडलेत. गाईड तुम्हाला ते दाखवतो. गुहेत पाहण्याच्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी आणि त्यांचं गुहेतील ठिकाण गुहेच्या बाहेर बोर्डावर दाखवलेल आहे. गुहेत जाताना बॅटरी असणे अत्यावश्यक. इथे सतत पाणी असतं, त्यामुळे पावसाळी पादत्राणे आवश्यक. अनेक ठिकाणी कपारी आहेत, खाच खळगे आहेत. गुहा काही ठिकाणी एकदम निमुळती, अरूंद होते, काही ठिकाणी अगदी कमरेपर्यंत वाकून चालवं लागतं. गुहेत अत्यंत काळजीपूर्वक वावरा, गाईडसोबत, एकत्र राहा. गुहेत शिरतानाही, गर्दीचा अंदाज घेऊन मगच आत जा. तशी इथे गर्दी कमी असते पण तरीही, गुहेच स्वरूप लक्षात घेता अति गर्दी असेल तर आतला ऑक्सीजन कमी होऊ शकतो आणि हे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो.
आणखी एक आणि सुप्रसिद्ध गुहा #मौसमाई. ही देखील चेरपुंजीजवळच आहे. चेरपुंजीचं स्थानिक भाषेतल नाव #सोहरा. ही गुहा सर्व टूरमधे दाखवली जाते. अर्थात ती प्रशस्त आहे आणि आतील लवणस्तंभांचे आकार विस्मयकारी आहेत. पण सहजप्राप्य असल्याने तिथे प्रचंड गर्दी असते. भर हंगामात गेलात तर चक्क रेटारेटी देखील! ते एक तीर्थक्षेत्र देखील आहे. नैसर्गिक आकर्षणाचं तीर्थक्षेत्र झाल्यावर जे घडतं ते तिथे घडतंय आणि यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आत शिरायची वाट चिंचोळी आहे, संपूर्ण गुहेत ठिकठिकाणी पाऊलभर पाणी साचलेलं असतं. उजेडसाठी दिवे लावलेले आहेत. एक दोन ठिकाणे गुहेत सूर्यप्रकाश येतो. पण एकूणच गर्दी, बेशिस्त आणि फोटो काढणारे हौशे गवशे यामुळे रसभंग होतो. बाकी काही पाहायला वेळ नसेल तर ही गुहा तुम्हाला मेघालयातल्या गुहांची छोटीशी झलक नक्कीच दाखवेल. तुमचा भ्रमनिरास नक्की होणार नाही. फक्त वर सांगितल तसं, अपरिहार्य गोष्टी कानामागे टाकाव्या लागतील. जर स्वत:मध्ये रमण्याची कला साधली, तर समस्त कोलाहलास फाट्यावर मारून तुम्ही या गुहेचा आनंद लुटू शकता.
तुम्हाला गर्दीची, कोंदटपणाची भीती वाटत असेल, बंदिस्त जागा अंगावर येत असतील तर ही गुहा तर टाळाच. कारण तिच्यात आत गेल्यावर मागे फिरता येतं नाही. दुसऱ्या टोकानेच बाहेर पडावे लागते. आणि तो मार्ग कमीत कमी १०-१५ मिनिटांचा आहे. त्यामुळे गुंफा पर्यटन करताना या बाबी नक्की लक्षात ठेवा. तर चेरपुंजी किंवा सोहरा आणि त्याच्या आसपासची ठिकाणं साधारण दिवसभरात बघून होतात. चेरपुंजीचा धबधबा, मौसमाई गुहा हे अति महत्त्वाचं. याच मार्गात नोह संगी ठियाअंग अर्थात सप्त भगिनी धबधबा देखील आहे. अवाढव्य दरीत सात बाजूंनी सात धबधबे एकत्र येतात. अतिशय रमणीय दृश्य. त्यातल्याच एक धबधब्याच्या काठावर इको पार्क तयार केलेलं आहे. इथे दिवसाच्या शेवटी छान श्रमपरिहार करून शिलॉँगकडे प्रस्थान करू शकता.
(क्रमश:)