लहानपणी, आई वडिलांना काशीला घेउन जाणारा श्रावण बाळ मनात ठसलेला असतो, मुघलांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडल्यावर व्यथित झालेल्या जिजाऊ पाहिलेल्या असतात, काशीच्या गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला हे वाचलेलं असतं. पंडित बिस्मिल्ला खान हेही काशीचेच; बनारस घराण्याच्या ठुमरीने कधीतरी मनावर गारुड घातलेल असतं, साड्यांच्या प्रदर्शनात अस्सल बनारसी शालू अणि नंतर त्याच्या किंमतीने, डोळे विस्फारलेले असतात. अगदी आत्ता आत्ताचं बघितलं तर बनारसच्या घाटांचे कृष्ण-धवल किंवा मग रंगीबेरंगी फोटो इन्स्टाग्रामवर पाहून आपण .. वाव, मस्त आहे, भारी आहे.. असं करत असतो. मोदींचा मतदारसंघ, तिथली अस्वच्छता, काशीचे पंडे असं या न त्या मार्गाने काशी आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे डोकावून जाते.
पण काशीमध्ये गेल्यावर खरं मनावर ठसतं ते जीवनातलं अंतिम सत्य ... मृत्यू. एक गुजराथी म्हण आहे, सुरतनो जिमण काशीनो मरण! इतकं महत्त्व इथल्या मरणाचं. इथे अंत्यविधीसाठी दोन घाट आहेत. हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट. हरिश्चंद्र घाटावर म्हणे खुद्द राजा हरिश्चंद्र मांग म्हणून राबलेला.
माझी पहिली भेट झाली ती हरिश्चंद्र घाटाशी. संध्याकाळी बोटिंगसाठी रस्ता विचारत गल्ली बोळांतून फिरताना एका बोळकांडीतून बाहेर आले आणि समोर पाहते तो समोर गंगामाईचं अथांग पात्र...
माझ्यात आणि गंगामाईमध्ये साधारण पन्नासेक पायऱ्यांचं अंतर. उजव्या हाताला अगदी नजरेच्याच टप्प्यात धडाधडा पेटलेल्या २ – ३ चिता, आणि समोर लिहिलेलं नाव ‘राजा हरिश्चंद्र घाट’.
आणि मणिकर्णिका घाट... संध्याकाळी नावेतून गंगा आरती पाहताना एक नजर उजवीकडे टाका, रेखीव घाटांच्या गर्दीत थोडंस लांब एका ठिकाणी लालबुंद प्रकाश दिसेल...जरा खाली नजर घ्या.. तो प्रकाश असेल परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या आत्म्यांच्या पार्थिवांच्या चितेचा.
हे दृश्य तुम्हाला अंतर्मुख करतं. एकच ठिकाणी तुम्ही अग्नीची, मानवाची, भावनांची दोन रूपं पाहत असता... आणि गंगा हे रोज पाहते.
मी मनकर्णिका घाटावर पोचले तेव्हा नुक्ती सकाळ होत होती. गंगेला श्वासात भरून घेत एक एक घाट नजरेत साठवत पुढे चाललेले. थोड्याच अंतरावर एके ठिकाणी लालिमा दिसली आणि त्या घाटाची खूण पटली.. मनकर्णिका घाट!
मन थोडंस दचकलं. पोचता पोचताच मनाची तयारी होईल अशी सगळी सामग्री तिथे होती. एका ठिकाणी ओंडके एकावर एक पद्धतशीर रचलेले होते, बाजूलाच रामाचं देऊळ होतं. चार पावलांवर एक मडक्यांचं दुकानं. एका कुत्रीची ४-५ पिल्ल तिथे विझल्या शेकोटीच्या उबेशी निवांत पहुडली होती, एक पिल्लू नुसतंच लुडबुडत होत, त्यांना काय कल्पना, तिथे काय चालू आहे.
तिथून समोर दिसणारं दृश्य मात्र नि:शब्द करणार होत. जीवन आणि मृत्यू मधलं अगदी काही पावलांचं अंतर मी अनुभवत होते. समोर १०-१२ चिता धडधडत होत्या. काहींची धग शांत झाली होती, काही जण मुक्तीच्या प्रतीक्षेत शांत पडले होते. एक विचित्र शांतता होती तिथे, कोलाहालातली शांतता. मृत्यू नंतर आत्म्याला जी शांतता वाटते ती कदाचित अशीच असावी, मनाला विचार चाटून गेला. मृत्यु नंतरची शांतता अशीच असते का? इथलं वातावरणही स्मशानापेक्षा वेगळंच. स्मशानात लोकांच्या डोळ्यांत पाणी असतं, आप्त, जिवलग गेल्याचं दु:ख स्पष्ट दिसत असतं. हा घाट तर मृत्यूघाटांचा राजा...पण एवढ्या चिता असूनही रडताना कोणीही दिसलं नाही हे विशेष. लोकांच्या चर्येवर प्रचंड तटस्थपणा दिसतं होता किंवा एखादं कर्तव्य, काम उरकून टाकल्याची भावना... त्या संपूर्ण घाटावरच शतकानुशतके, अहोरात्र जळणाऱ्या चितांच्या राखेचा करडा थर!
तटस्थ अंतिम सत्य हे असं समोर आणते काशी, ते तटस्थतेनं स्विकारायला शिकवते. अनेक जन्माच्या फेऱ्यामधलं ‘मनुष्यजन्म’ फक्त एक ठिकाण, पुढे जाण्यासाठी साधन मृत्यूच, मग तो कुठल्याही जन्मातला. एवढं साधंसुधं उघड सत्य!
- तेजाली शहासने.
१२/०८/२०१८
#latepost #kashi #banaras #varanasi