रविवार, २४ जुलै, २०२२

डेक्कन कॉलेजातील लोकमान्य टिळकांचा वारसा

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्य समरातील एक युग पुरुष. ज्यांच्या केवळ लेखणीने एक मोठी क्रांती घडवून आणली, ज्यांच्या अग्रलेखांनी ब्रिटिश सरकारला धारेवर धरले आणि ज्यांच्या केसरीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

विचार करा, ज्या माणसाच्या केवळ शब्दांत एवढं बळ होतं की त्यांना घाबरून ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षे अतिशय खडतर अशा मंडाले तुरुंगात तुरुंगवासाची शिक्षा दिली, त्यांच्या बुद्धीचं तेज किती प्रखर असेल! पण ते फक्तच एक क्रांतिकारक लेखक होते का? त्यांच्या प्रखर देशप्रेमामागे एका प्रकांड पंडिताची वैचारिक बैठक होती. ते एक उत्तम वकील, तत्त्वज्ञ होते. संस्कृत, गणित आणि ज्योतिष विषयांत निष्णात होते. पण एवढी विद्वत्ता त्यांनी कशी मिळवली असेल? कुठून एवढं ज्ञान मिळवलं असेल?

या मोठ्या प्रश्नाच्या उत्तराचा एक छोटासा भाग मी माझ्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात पाहिला. त्यांनी वाचलेली ग्रंथ संपदा!


 आमच्या या कॉलेजच्या ग्रंथालयात लोकमान्य टिळकांनी स्वत: वाचलेल्या, अभ्यासलेल्या  पुस्तकांचं एक कपाट आहे.
याचं नाव आहे ‘Lokmanya Bal Gangadhar Tilak Vedic Collection’. ही पुस्तकं कॉलेजला देणगी म्हणून मिळालेली आहेत. ही पुस्तकं म्हणजे त्यांनी वाचलेल्या एकूण पुस्तकांचा एक छोटासा भाग असतील. पण त्यांची नावं आणि विषय हे एवढे मातब्बर की एवढं ज्ञान पचवायला एखादी व्यक्ती आयुष्य खर्ची घालेल. उदा. Language (Bloomfield), Original Sanskrit Text (सर्व खंड), The Saiva And Sarta Upanishada, Vedischz Mythologiz I II III, Ludwig Der Rigwed, Alt Indien, Nyay Prakash (Edgerton), The Samanya Vedant Upnishad, Secred Books of the East (F. Max Moller). 

(याच पुस्तकावरून लोकमान्य टिळकांनी आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला.)

यात ज्या पुस्तकवरून त्यांनी मंडालेमध्ये आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला त्या The origin of Aryans ते पुस्तकही आहे. या आणि या कपटातील सर्व पुस्तकांना लोकमान्य टिळकांचा पवित्र हस्तस्पर्श झालेला आहे. 




  
 

आज लोकमान्य टिळकांच्या जन्मदिनी मी खरंच स्वतःला नशीबवान समजते की ते शिकलेल्या (डेक्कन कॉलेज पुणे) आणि त्यांनी स्थापन केलेल्या (बी. एम. सी. सी. डेक्कन एज्युकेशन सोसा. पुणे) अशा दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. या संपन्न वारशाबद्दल मला अभिमान वाटतो आणि त्यांचे  जीवनचारित्र, या कॉलेजची वास्तू, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची स्पंदने मला हा संपन्न वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतात.

-तेजाली चंद्रकांत शहासने


रविवार, १० जुलै, २०२२

जेव्हा मला विठ्ठल भेटला ...

चित्र - आंतरजालावरून साभार   
 

पंढरपुरी, युगे अठ्ठावीस हात कटीवर ठेवून, विटेवर उभा राहून, या विश्वाचा जगडव्याळ व्याप शांतपणे पाहत आहे पांडुरंग! कोणाचा विठू, कोणाचा विठोबा, कोणाची विठू माऊली, कोणाचा सखा पांडुरंग तर कोणाचा पंढरीनाथ... असा हा, सर्व जातीधर्म, नाती, लिंगभेद आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून या सर्व चराचराला व्यापून उरणारा पांडुरंग...आणि त्याच्या ओढीने दर वर्षी पायी वाट तुडवत पंढरपुरची वारी करणारे वारकरी. गेली आठ-नऊ शतके त्या विठू माऊलीच्या चरणाशी तादात्म्य पावत एकरूप होऊन, प्रत्यक्ष उदहरणानेच अद्वैताचे तत्त्वज्ञान सांगत, समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचे काम या वारकरी संप्रदायातील संत करत आहेत. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर विरळाच. 'एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. त्यापुढे जाऊन मी म्हणेन 'एक तरी वारी अनुभवावी'. खरंच, कधीतरी सहज एखाद्या दिंडीत एखाद्या वारकाऱ्याबरोबर चालून बघा, त्याची विठ्ठलाची ओढ एवढी की तुम्हाला त्याच्यामागे धावावं लागेल. एखाद्या माऊलीला सहज विचारून बघा, कितवी वारी मावशी? तीला कदाचित आकडा आठवणारही नाही; पण ती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भेटलेल्या विठू सावळ्याच्या गोष्टी नक्की सांगेल. कधी तो तीला शिवारात भेटला असेल, कधी बाजारात जड टोपली उचलताना कोणीतरी पुढे केलेल्या हातात भेटला असेल. कोणाला अगदीच हाता-तोंडाशी आलेलं पीक जातंय की काय झालेलं असताना बरसलेल्या पावसात भेटला असेल. कोणाला शेवटची बस निघून गेल्यावर अवचित भेटलेल्या फटफटीवाल्याच्या रूपात भेटला असेल. असा हा पांडुरंग, श्रद्धा असेल त्याला फुला-पानांत, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तो सापडतो आणि मग तो वारकरी गाऊ लागतो कांदा, मुळा, भाजी| अवघी विठा बाई माझी| लहानपणापासून ही संत परंपरा पाहत मी मोठी झाले. माझे बाबा दासबोध वाचत, आजी कलावती आईंची भजनं गात असे. पुण्यात आल्यावर पहिल्यांदा वारी जवळून पाहिली. वारकरी पाहिले. तो अफाट जनसमुदाय एकाच ओढीने पुढे जाताना पाहणं ही देखील एक वेगळीच अनुभूति होती. पण आत कुठेतरी रितं रितं वाटायचं. कधी आपल्याला भेटेल का पांडुरंग? एवढी भक्ती, एवढी ओढ आपल्यात कधी येणार? नंतर नंतर तर “आपल्याला का नाही भेटत पांडुरंग?; आपल्यालाच का नाही भेटत? तो तर केवढा साधा भोळा, थोड्याशा भक्तीनेही प्रसन्न होणारा.. मग का नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक वर्षं गेली. एके दिवशी रिकाम्या वर्ड फाईलकडे पाहत काहीतरी लिहायचा विचार करत होते. एकीकडे ‘कानडा राजा पंढरीचा... ’ वाजत होतं; काहीतरी डोक्यात होतं पण शब्दच सापडत नव्हते. त्या कल्पनेचं टोक काही हातात येत नव्हतं. काहीतरी अव्यक्त, निराकार असं डोक्यात घुमत असताना ओळी ऐकू आल्या निराकार तो निर्गुण ईश्वर| असा प्रकटला कसा विटेवर| आणि... आणि या ओळींनी माझ्या आयुष्यात युरेका क्षण आणला. अरेच्चा... एवढी वर्षं अनेक अमूर्त, निराकार कल्पना आपण शब्दांत पकडून या कागदावर, विटेवर साकार करून लिहिल्या की! जणू तो ईश्वर जो अद्वैत आहे, अमूर्त, निराकार, निर्गुण आहे, जशा माझ्या मनातल्या संकल्पना आहेत; त्याच कागदावर शब्दांच्या रूपात उमटल्यात... त्या विठू माऊलीने... पांडुरंगाने माझ्या शब्दांचं रूप घेऊन, कागदाच्या विटेवर आपले रूप प्रकट केले. म्हणजे, हा पांडुरंग आतापर्यंत मला कित्येक वेळा भेटला... वेगवेगळ्या शब्दांची रूपं घेऊन किती वेळा त्याने मला मार्ग दाखवला, मला उपदेश केला, माझी पाठ थोपटली... माऊली! कसं गं लक्षात आलं नाही माझ्या? आणि त्या क्षणी मला कर्मयोगाचा पहिला साक्षात्कार झाला. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी ही आठवण तुम्हाला सांगताना माझ्या मनाला खूप समाधान लाभत आहे. या निमित्ताने आज पुन्हा या महान संतपरांपरेचा आपण जागर करू, कर्मयोगाचा जागर करू. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! तेजाली चंद्रकांत शहासने १० जुलै २०२२

#वारी #पंढरपूर #आषाढी #आषाढीएकादशी #मराठी #विठोबा #contentwriter #contentcreation #linkedinforcreators #storytelling #मराठी #म #कर्मयोग #karma #karmayoga