शुक्रवार, ३ मे, २०१९

दुसरा प्याला




   व्हिस्कीच्या दुसऱ्या पेगबरोबर किंवा बियरच्या दुसऱ्या बाटलीबरोबर झाकणाबरोबर मनाची दारंही उघडायला हवीत, तर त्या बैठकीची खरी मजा. पण अशी बैठक अगदी राखीव लोकांसोबतच! उगाच आहेत म्हणून १५-२० टाळकी एकत्र करून बसलात तर तो आपल्या वेळेचा आणि दारूचा फक्त अपव्यय होतो, अशा वेळी फक्त तीर्थप्रसादच बास! (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी टिप्पणी: दारूबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, संदर्भासाठी चित्रलेखा हा मीनाकुमारीचा चित्रपट पहावा).
    बैठक हवी निवडक जिवलागांसोबत! एखादी दुपार, संध्याकाळ किंवा रात्र आणि हाताशी भरपूर वेळ. थंडगार बियर घशातून शरीरात जाताना पेशीपेशीला एक हलका धक्का देत जाते, मेंदूच्या घट्ट बिजागऱ्यांत थोडं वंगण घालून सैल करते आणि मनांचे दरवाजे किलकिले करते. घोटागणिक मन सैलावतं, अस्वस्थतेचा अदृश्य बोळा निघतो आणि दुसऱ्या बाटलीच्या बुच्चासोबत फसफसून मनातल्या गोष्टी बाहेर पडायला लागतात. मनाच्या अथांग डोहातील शब्द मौत्तिके उधळू लागतात. तुला एक सांगतो... या धृवपदामागोमाग प्रत्येक प्याल्याबरोबर मनातली गुपितं, चिंता, काळज्या, वैताग यांचे अंतरे बाहेर पडतात... आणि माणूस हळू हळू मोकळा होतो. कोणाला गझल सुचते, कोणी कविता म्हणतं, कोणी हसायलाच लागतं, कोणाच्या जुन्या खपल्या निघून मग अश्रूंचा पूर लोटतो. पण गंमत खरी तेव्हाच असते. आपल्या रडणाऱ्या मित्राचं त्यावेळी ज्या शब्दात सांत्वन होतं, त्या कल्पकतेला तोड नाही.(हे सगळेच मान्य करतील). अशा वेळी साक्षात सरस्वतीच जिभेवर नृत्य करत असते.
    आता तुम्ही म्हणाल बियरच का? तर ते तर फक्त एक उदाहरण. मुख्य मुद्दा मन सैलावणं. विश्वाच्या जगड्व्याळ व्यापात परमेश्वराने माणसाला एवढी बुद्धी दिली, पण मन मोकळं करण्याची कला मात्र दिली नाही, (ज्याला ती साधली त्याने जग जिंकलं, बाकी तुमच्या आमच्यासारखे पामर) Freedom of expression आहे हो आपल्याला. पण ते वरवर! सगळंच प्रचंड भौतिक. आपल्याला नक्की काय वाटतंय हे आपल्याला तरी समजतं? (समजत असतं तर ही आध्यात्माची दुकानं एवढी चालली नसती. असो.) मग कसलं आलंय freedom of expression? जसं जसं जबाबदारी वाढते, माणूस मोठा होतो, भाव-भावनाचे विविध कंगोरे समोर येतात, अनेक गोष्टी मनात सलतात, अनेक मान-अपमान, चिंता, असुरक्षितता, व्यंगं, बीभत्सपणा, ताण-तणाव अपरिहार्यपणे समोर येतात. पण हे सगळं हाताळायचं कसं हे मात्र कोणी शिकवत नाही. उलट, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हणून त्याचं उदात्तीकरण केलं जातं. (मग काय, freedom of expression घंटा!). आणि मग त्याचे परिणाम रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि बरंच काही!!
    एवढं सगळं होण्यापेक्षा मोकळे व्हा ना. आता परत मुद्दा बियरचा.. वा तत्सम पदार्थांचा. तर ही सगळी उदाहरणं. याचं मी काही उदात्तीकरण वगैरे करत नाही. बस महत्त्वाचं; विश्वासू आपल्या माणसासोबत घालवलेला वेळ. मग ती बियर असो, चहा असो किंवा पिझ्झा असो.

उदरात एकदा आहुती पडली की मुळात मन शांत होतं, यात मादक पदार्थ जरा लवकर काम करतात इतकंच. पण सख्या-सोबत्यांना घेऊन एकत्र केलेलं निवांत डिनर देखील तेवढंच परिणामकारक. मनाची दारं उघडणं गरजेचं. (My personal choice is still scotch). आणि त्यासाठी असा निवांत वेळ काढणंही...
- तेजाली शहासने.
29/04/2018

२ टिप्पण्या: