मंगळवार, २९ जुलै, २०२५

 

मुलाखतीसाठी इंग्रजी 

भारताचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे. व्यवसायाची केंद्रे दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, कलकत्ता अशी भारतभर पसरलेली आहेत. त्यामुळे आपसूकच बहुभाषिकतेवर उतारा म्हणून भारतात इंग्रजी भाषा या विविध प्रांतातील विविधभाषी लोकांना जोडण्याचं काम करते. त्यामुळेच इंग्रजीच महत्त्व व्यावसायिक जीवनात अतिशय वाढलेले दिसते. इंग्रजी येत नाही, नीट बोलता येत नाही म्हणून अनेकांच्या मनात न्यूनगंड असतो आणि त्यामुळे चांगल्या संधी हातातून जातात किंवा त्या घेण्याचा आत्मविश्वास लोकांकडे नसतो.

पण इथे एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि आपले आपल्या विषयातील सखोल ज्ञान. इंग्रजी ही एक भाषा आहे. तुमचे विचार, ज्ञान तुम्ही समोरच्यापर्यंत पोचवण्याची संधी ही भाषा तुम्हाला प्राप्त करून देते. त्यामुळे इंग्रजीचा बाऊ करण्यापेक्षाही आपले ज्ञान, स्पष्ट विचार, आणि सहज संभाषण कौशल्य यावर उत्तम पकड कशी येईल याचा विचार आधी करणं आवश्यक आहे. योग्य रीतीने संवाद साधणं, आपले विचार योग्य प्रकारे मांडता येणं हे  मुलाखतीसाठी आवश्यक असतं. संभाषण कौशल्य उत्तम असेल तर इंग्रजीतूनही उत्तम मुलाखत तुम्ही देऊ शकाल.

खास मुलाखतीसाठी म्हणून इंग्रजीची तयारी करताना खालील गोष्टी महत्त्वाच्या. हे मुद्दे लक्षात घेऊन त्यासंबंधीत शब्द, वाक्यरचना, संभाषण इंग्रजीतून करण्याची तयारी केलीत तर मुलाखतीस  तुम्हाला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.   :

इंग्रजी भाषा सुधारण्याच्या दृष्टीने :

मुलाखतीत काही विशिष्ट प्रश्न आवर्जून विचारले जातात. उदा. तुमच्याबद्दल सांगा किंवा तुम्हाला ही नोकरी का हवी?  या प्रश्नांना तुम्ही दिलेल्या उत्तरांवर मुलाखातीची दिशा ठरते. अशा काही ढोबळ प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आधीच इंग्रजीत तयार करता येतील. ती करा आणि त्याबद्दल संभाषण करायचा सराव करा. आणखी काही उदाहरणे खालील प्रमाणे

१. योग्य अभिवादन आणि स्वत:ची ओळख करून देणे - मुलाखतीची वेळ, व्यक्तीचा हुद्दा, इ. लक्षात घेऊन नमस्ते, good morning, good afternoon, किंवा hello म्हणून अभिवादन करता येईल. त्यानंतर स्वत:ची माहिती सांगा. ही सर्व माहिती इंग्रजीतून सांगण्याचा घरी सराव करा. हे बोलताना आपल्या आवाजात नम्रता आणि आत्मविश्वास असू द्या. ही ओळख अतिशय महत्त्वाची असते. साधी सोपी वाक्यरचना ठेवा. अकारण शब्दबंबाळ बोलू नका. पाल्हाळ लावू नका. तुमचे शिक्षण, पार्श्वभूमी, अनुभव, छंद इत्यादि माहिती यात देता येते.

२. तुमचा आतापर्यंतचा अनुभव – याबद्दल माहिती देताना साधारण किती वर्षांचा अनुभव आहे हे सांगून पुढे तुमच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटना, प्रकल्प, त्यातून तुम्ही काढलेले निष्कर्ष अशा विविध बाबी बोलता येतील.

३. त्या-त्या क्षेत्राशी संबंधित कळीचे मुद्दे – तुमच्या क्षेत्राशी संबंधित ताज्या घडामोडी, कायदे, त्याबद्दल तुमचे मत, दृष्टीकोन, त्यासंदर्भात तुम्ही केलेले काम किंवा काम करण्याची इच्छा याबद्दल तुम्हाला इंग्रजीतून बोलता येणे आवश्यक आहे.

४. तुमच्या कामाशी संबंधित विशिष्ट शब्दसंग्रह, संज्ञा आणि तांत्रिक माहिती – मुलाखत देताना योग्य मुद्देसूद उत्तरांसोबतच खास त्या क्षेत्रातल्या संज्ञा, शब्दप्रयोग तुमच्या बोलण्यात यायला हव्यात. असे शब्द शोधून ते संभाषणात विविध प्रकारे वापरण्याचा सराव करा. साधारण त्या त्या व्यवसायाची एक स्वतची भाषा असते. ती भाषा आत्मसात करा.

५. औपचारिकता – औपचारिकता हे मुलाखतीतले खूप महत्त्वाचे अंग आहे. आपल्या वागण्या-बोलण्यातून औचित्याभंग होणार नाही, सर्वांचा आणि स्वतचाही मान राखला जाईल याची सर्वतोपरी काळजी घ्या. अनेकांना बोलता बोलता अपशब्द वापरण्याची सवय असते. पाय हलवणे, केस खाजवणे अशा सवयी असतात. इंग्रजी बोलण्यातही अकारण शीट, ब्लडी असे शब्द किंवा अकारण शब्दांची लघुरूपे वापरण्याची सवय असते, याह, यु नो, सो असे शब्द सारखे मधेमधे वापरायची सवय असते. तुम्हाला अशा सवयी असतील तर मुलाखतीत त्या दिसणार नाहीत याकडे लक्ष द्या.   

मुलाखतीसाठी वरील मुद्यांची माहिती इंग्रजीत सांगण्याचा सराव केलात तर मुलाखत देणे कठीण जाणार नाही. इंग्रजीतून बोलण्याचा सराव तुमच्या घरातले किंवा मित्र-मैत्रिणींसोबत करा, मॉक इंटरवयूचा सराव देखील तुमचे संभाषण सुधारेल.

व्यावसायिक प्रकारचे इंग्रजी बोलता येण्यासाठी तसा शब्दसंग्रह अतिशय आवश्यक. त्यासाठी खास तुमच्या क्षेत्रातील व्यावसायिक प्रकाशने नक्की वाचा. नसेल जमत तर कमीत कमी एक चांगले इंग्रजी वृत्तपत्र, पुस्तके, ब्लॉग्स वाचता येतील. उत्तम इंग्रजी मुलाखती ऐका. अनेक उद्योजक, यशस्वी विद्यार्थी, शास्त्रज्ञ यांच्या मुलाखती विविध माध्यमांवर उपलब्ध आहेत. या ऐकून इंग्रजीतील संवाद कसा करायचा, शांतपणे उत्तर कसं द्यायचं, योग्य शब्द निवड कशी करायची हे शिकता येईल.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमचे ज्ञान, अभ्यास आणि स्वत: वरचा आत्मविश्वास कायम ठेवा. इंग्रजी हे फक्त एक माध्यम आहे. ते प्रभावीपणे वापरा. मुलाखतीत इंग्रजी थोडं चुकलं तुमची मांडणी आणि अभ्यास चुकवू नका. आत्मविश्वास कायम ठेवा.

 

मुलाखतीला जाताना लक्षात घेण्याच्या काही सर्वसाधारण बाबी खालीलप्रमाणे :

 

1.    उत्तर देताना मुलाखतकाराकडे पाहून, शक्यतो नजरेस नजर देऊन उत्तर द्या. यातून तुमचा आत्मविश्वास दिसतो. मात्र नजरेत अहंकार, मग्रुरी दिसणार नाही याची काळजी घ्या.  खाली पाहून उत्तर देऊ नका.

2.    मुलाखतीस जाताना नीटनेटके जा. तुमच्या व्यवसायास साजेसे योग्य मापाचे, शक्यतो सौम्य रंगाचे, स्वच्छ कपडे कपडे घाला. केस नीट विचारलेले, नखे स्वच्छ, नीट कापलेली, वाढवलेली असल्यास त्यांची निगा राखणे आवश्यक. शक्यतो दाढी करून जा, दाढी राखलेली असल्यास ती नीटनेटकी असावी. 

3.    हलकासा मेकअप तुम्हाला नीटनेटके दिसण्यास मदत करतो. पण तो आवश्यक आहेच असे नाही. तुम्हाला घाम जास्त येत असल्यास, बराच प्रवास करून मुलाखतीस जायचे असल्यास डिओ अवश्य वापरा. सुगंधाने मनही प्रसन्न होते. मात्र उग्र वासाच्या अत्तरांचा वापर टाळा. आपले व्यक्तिमत्व प्रसन्न आणि नीटनेटके असणे आवश्यक आहे. 

4.    आभूषणे मर्यादित ठेवा. मुलाखत देताना तुमच्या आभूषणांमुळे मुलाखतकाराचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. घडयाळ आवर्जून वापरा.

5.      ज्या संस्थेत मुलाखतीसाठी जात आहात आणि ज्या कामासाठी मुलाखत आहे त्याची पूर्ण माहिती घ्या. संस्थेची तत्वे, धोरणे, सद्यपरिस्थिती, साधारण इतिहास याचा अभ्यास केला तर त्या अनुषंगाने तुम्ही योग्य उत्तरे देऊ शकता. शक्य झाल्यास आपल्या मुलाखतकाराबद्दलही माहिती घ्या. त्याने केलेल्या कामाची उदाहरणे तुम्ही मुलाखतीत वापरली तर त्यातून तुमची सखोल अभ्यास करण्याची आणि माणसे जोडण्याची वृत्ती दिसून येते. कुठल्याही संस्थेत व्यक्तिगत संबंध खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येकाशी व्यक्तिगत पातळीवर जोडले गेल्यास तुम्ही त्यांच्या चांगले लक्षात राहता. 

- तेजाली चंद्रकांत शहासने

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

 

सावध ऐका पुढल्या हाका| छद्मी ईमेल्स आणि कॉल्सच्या ||



 

रोज फक्त पंधरा मिनिटे काम करून दिवसाचे ५००० कमवा, 

फक्त विडियो लाईक करून महिन्याला ३०००० रुपये कमवा,

 पुढच्या एक तासात वीजबिलाचे पैसे भरले नाहीत तर तुमचे कनेक्शन तोडण्यात येईल, तत्काळ पैसे भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या अशा प्रकारचे संदेश तुम्ही पाहिले असतील, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अनेकदा आलेही असतील. कदाचित त्यामुळे तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल, कधी भीती तर कधी अगदी असे मेसेज वाचून हृदयाची धडधडही वाढली असेल. पण हे सर्व होऊनही तुम्ही त्यांना बळी पडला नसाल तर तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी ठरला आहात.

सध्याचं युग हे मार्केटिंगचं युग आहे असं म्हटलं जातं. आपलं उत्पादन ग्राहकाच्या गळी उतरवण्यासाठी संस्था वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात. गोडी गुलाबीने आपल्या उत्पादनाची स्तुती करण्यापासून ते आमचं उत्पादन वापरलं नाहीत तर जणू जगबुडीच होईल अशी गर्भित धमकी देण्यापर्यंत कुठलेही मार्ग त्यांना वर्ज्य नसतात. हेच लोण आता अगदी तुमच्या मोबाईलपर्यंत येऊन पोचलं आहे.

बोलण्यात गुंतवून, गोड बोलून, हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार दशकानूदशके चालू आहेत. गुन्हेगार समोरच्याचे कच्चे दुवे हेरून त्यांचा वापर करून माणसाला फसवतो हे या सर्व गुन्ह्यामागचं समान सूत्र. बऱ्याच वर्षांपूर्वी घरोघरी फिरून वस्तू विकणारे सेल्समन, सेल्सगर्ल्स असत. त्याच्या माध्यमातून पाळत ठेवून, माहिती काढून चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते. आज या गुन्ह्याचं सुधारित रूप आहे आपल्या मोबाईल आणि ई मेलमधून आपल्यापर्यंत पोचणारे ई विक्रेते किंवा ई सेल्सपर्सन.

यांच्यापासून दूर राहायचं, अशा मेसेजेसना उत्तर द्यायचं नाही हे आपल्याला माहिती असतं. परंतु काही ना काही कारणामुळे एका क्षणासाठी दुर्लक्ष होतं आणि आपण एका गुन्ह्यास बळी पडतो. अनेकदा तर नक्की हा संदेश खरा आहे की खोटा? खरा असेल तर उगाच भुर्दंड बसेल यासारखी भीतीही मनात निर्माण होते आणि नंतर कटकट नको म्हणून आपण त्या संदेशातील लिंकवर क्लिक करतो आणि नंतर फसवणूक होते.

आज भाषातज्ज्ञ म्हणून काम करताना या सर्व प्रकारच्या संदेश, ईमेल्स किंवा फोनकॉल्समध्ये मला काही समान धागे दिसतात. हे संदेश थोडे बारकाईने वाचले तर त्यातील शब्द, लेखन, मजकूर या आधारे आपण मेसेज खरा की खोटा याचा अंदाज घेऊन पुढे योग्य ती पावले उचलू शकतो. तर मुळात हे असे फसवणुकीचे ईमेल्स, संदेश, फोन कॉल्स ओळखायचे कसे याची माहिती या लेखात घेऊ या.

१.       अनधिकृत क्रमांक किंवा ई पत्त्यावरून आलेले संदेश – तुमचे कर्ज, वीजबिल, पाणी, टेलीफोन अशा कोणाकडूनही होणारा पत्रव्यवहार हा त्यांच्या ठरलेल्या ई-पत्त्यावरून किंवा मोबाईल क्रमांकावरून होतो. शक्यतो अशा संस्थांचे संदेश त्यांच्या विशिष्ट नावानिशी तुम्हाला येतात उदा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेसेजच्या नावात SBI असतं, एअरटेलच्या मेसेजवर Airtel. असे त्या त्या संस्थांची लघुरूपे असतात. कुठलीही संस्था वैयक्तिक क्रमांक अथवा ई पत्त्यावरून संपर्क करत नाही.   

२.       लेखन आणि वाक्यरचना – कुठलीही संस्था आपल्या ग्राहकांना एका विशिष्ट शैलीत संपर्क करते. हे लेखन औपचारिक असतं. तुमच्यासाठी असलेल्या संदेशात तुमचं नोंदणीकृत नाव, तुमचं खाते क्र. असे तपशील असतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे लेखन नेटकं, अचूक असतं. याउलट फसव्या संदेशात बरेचदा फक्त नमस्कार प्रिय ग्राहक, hello esteemed customer असे मोघम उल्लेख असतात. त्यात तुमचं नाव नसतं. लेखन अर्धवट, घाईघाईत लिहिलेलं असतं, अनावश्यक लघुरूपे असतात. त्यात खास तुमच्या माहितीचा उल्लेख नसतो. वाक्यरचना चुकीची, अर्धवट असते. मराठी असेल तर ते यांत्रिक भाषांतर असतं, इंग्रजी लेखनात स्पेलिंगच्या, वाक्यरचनेच्या चुका असतात. असे संदेश नेहमीच टाळा.

३.       भीती दाखवणारे संदेश – फसवणूक करणारा माणसाच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेतो. अनेकांना वेळेवर बील दिलं नाही, एखाद्या गोष्टीची वेळेवर पूर्तता केली नाही, समोरचा घाई करत असेल तर त्याची दखल घेतली नाही तर अस्वस्थ वाटत राहतं, चीडचीड होते. अपराधीपणाची भावनाही निर्माण होते. आपण समोरच्याने सांगितलेल्या वेळेत ते केलं नाही तर आभाळ कोसळेल, किंवा ती ऑफर आपल्याला मिळणार नाही, आपले पैसे वाचणार नाहीत या भावणेतूनही अनेकदा लोक अशा घाई करणाऱ्या संदेशाला बळी पडतात. फसवणूक करणारे संदेश नेहमीच असे भीती दाखवणारे, वेळेचं अवाजवी बंधन घालणारे असतात. त्यामुळे असं काहीही संदेशात किंवा ई मेलमध्ये असेल तर त्या संस्थेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क करून त्याची आधी खातरजमा करावी. कर्जाचे हप्ते, पाणी जोड वीज जोड संबंधित कुठलीही कारवाई होणार असेल तर त्यासंबंधी पूर्वसूचना अधिकृत मार्गांनी पत्राद्वारे, वैयक्तिक रित्या भेटून दिली जाते. असे अधिकृत पत्र सोडून कुठल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.  

४.       अनाहूत संदेश – फसवणुकीचे संदेश नेहमीच अनाहूत असतात. अचानक कधीतरी अनोळखी क्रमांकावरून तुम्हाला फोन येतो किंवा एखादा मेसेज येतो. यातली भाषा अनेकदा आर्जवी, गळेपडू असते. काहीतरी आमिष असतं, किंवा अशक्यप्राय कमी किमतीत, सवलतीत वस्तू देण्याचे आश्वासन असते. एवढं स्वस्त कसं असा प्रश्न आपल्याला पडतो. हा प्रश्न पडणं हीच फसवणुकीच्या संदेशाची ओळख. त्यापासून दूर राहा. तो संदेश डिलिट करा आणि तो क्रमांक ब्लॉक करा. हल्ली असे संदेश व्हॉटस अॅपवरही येतात. Do you have a few minutes? I have an interesting offer. अशा आशयाचा मेसेज त्यात असतो. हे काय म्हणून आपण सहज बघायला जातो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो.

५.       अनाहूत विडिओ कॉल्स – व्हॉटस अॅपवर विडिओ कॉल करून अश्लील चित्रफीत दाखवून ब्लॅकमेल करण्याच्या बऱ्याच घटना सध्या दिसून येतात. अनोळखी क्रमांकावरून आलेले हे विडिओ कॉल्स काही सेकंदच असतात परंतु यात नकळतपणे आपला विडिओ रेकॉर्ड केला जातो. नंतर हेच व्हीडियो आपल्या फोटोसह आपल्या नातेवाईक, मित्रवर्तुळात पसरवण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. बदनामी होईल या भीतीने चूक नसतानाही या फसवणुकीस बळी पडतो. असे कॉल्स न घेणं महत्त्वाचे पाऊल. हे क्रमांक अनोळखी असतातच आणि अनेकदा भारतातील नसतात, म्हणजेच त्यांची सुरूवात +९१ ने होत नाही. तर कुठल्याही अनोळखी क्रमांकावरून येणारे विडिओ कॉल्स घेणे १०० % टाळा. असा कॉल आल्यास तो मोबाईलवर कट कसा करायचा हे शिकून घ्या, कट करता आला नाही तर तो बंद होईपर्यंत तसाच वाजू द्या. नंतर तो नंबर रिपोर्ट करून ब्लॉक करा.

 - तेजाली चंद्रकांत शहासने

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्यविश्व जानेवारी 2024 

 

गुरुवार, २० जुलै, २०२३


समाजमाध्यमांवर धोरण म्हणून एखादी भाषा वापरताना तीचा योग्य वापर खूप महत्त्वाचा. भाषेचं व्याकरण, धाटणी जपणं, त्यात इतर भाषांची अनावश्यक भेसळ करणं आवर्जून टाळणं यातून त्या लिखाणाचा आणि लेखकाचा अस्सलपणा दिसतो. त्याचे कष्ट, विषयावरची पकड लक्षात येते. सोपी अर्थवाही वाक्यरचना आणि नेटकी मांडणी हे लेखनाचे श्वास आहेत.

 दुसऱ्या भाषेतील शब्द वापरूच नये असं नाही. पण ते शब्द वापरताना, खरंच याची इथे गरज आहे का, याला त्या भाषेत कुठला शब्द आहे का हे प्रश्न परत परत विचारून अपरिहार्य परिस्थितीतच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरावा असं मला वाटतं. दुसऱ्या भाषेतील शब्द आपण वापरतो तेव्हा आपण वाचकाला ती भाषा येते हे गृहीत धरतो. या गृहीत धरण्याला माझा आक्षेप आहे. 

कुणालाही गृहीत धरू नये हे व्यवस्थापन आणि संज्ञापनातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. इतर भाषांतले अगदी साधे साधे शब्दसुद्धा एखाद्याला माहिती नसण्याची शक्यता आपण कधीच नाकारू शकत नाही. (साध्या रोजच्या आयुष्यात वाचता वाचता 4 वेळा शब्दकोश पाहावा लागत असेल किंवा परभाषिक शब्द असल्याने त्यांचे अर्थ लागत नसतील तर त्या लेखनाचा काय उपयोग?)

आज आशय लेखन हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. त्यामुळे कोणालाही 'गृहीत' न धरता, सर्वांना समजेल असे समतोल,
लेखन करणं, चुकीचे पायंडे पडू न देणं ही एक आशय लेखक म्हणून सदैव आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं.

- तेजाली चंद्रकांत शहासने 
२१ जून २०२३ 

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

बहुभाषिकत्व आणि उद्योगवृद्धी

पूर्वप्रसिद्धी : वाणिज्य विश्व दिवाळी अंक 2022 
तेजाली चंद्रकांत शहासने 
 


(चित्र आंतरजालावरून साभार)   


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पंतप्रधानपदाची कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आणि भारतीय उद्योग जगतात नवसंकल्पना, नवनिर्मितीचं वारं खेळू लागलं. भारतीय उद्योगजगताचा प्रवासही आता ग्लोबल ते लोकल असा व्हायला लागला आहे. तर मग आपल्या व्यावसायिक वापरातही आपण जास्तीत जास्त प्रादेशिक, स्थानिक भाषांना प्राधान्य द्यायला हवं.

आता भारत ही 100 कोटी लोकसंख्येची एक मोठी बाजारपेठ आहे आणि मुख्य म्हणजे ही सर्व बाजारपेठ बहुभाषिक आहे. सन 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात 22 अधिकृत भाषा आहेत आणि साधारण 57% लोक हिंदी बोलू शकतात. त्याखालोखाल बंगाली, मराठी, तेलुगु, तमिळ आणि पुढे अशी उतरंड आहे. या यादीत इंग्रजी सर्वांत शेवटी येते. इंग्रजी बोलू शकणारे लोक भारतात 10%च आहेत आणि तरीही आपण सर्वत्र इंग्रजीचा मुक्त वापर बघतो, जणूकाही आपण गृहितच धरतो की प्रत्येकाला इंग्रजी येतेच. उलट जपान, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांत जा, इंग्रजी औषधाला सापडणार नाही आणि यातून त्यांचं काहीच अडत नाही. याउलट भारतात तर व्यवसायात, नोकरीत उत्तम यश मिळवायचं असेल तर इंग्रजी आलंच पाहिजे असा जणू पायंडाच पडून गेलाय. मग ते इंग्रजी नीट यावं म्हणून आटापिटा! आपल्या मुलांना मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमात घालण्यापासून सर्व प्रयत्न आपण केले. पण इंग्रजी येतंय म्हणून कोणी छातीठोकपणे यशस्वी झाला आणि इंग्रजी नीट येत नाही म्हणून अयशस्वीच राहिला असं कधी झालंय का?

इंग्रजी न आल्यामुळे अनेक लोक महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहतात किंवा त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. यातूनच मग इंग्रजी शिकणं आज अपरिहार्य झालेलं आहे. आता भारतात एवढी भाषिक विविधता असताना अशी एकच भाषा वापरण्यास भाग पाडणं योग्य आहे का? समजा मराठी माणसाला मराठीतून, कानडी माणसाला कानडीतून माहिती मिळाली तर त्यांना किती आनंद होईल! भारतातली ही भाषिक परिस्थिती पाहता ‘ग्लोबल ते लोकल’चा प्रवास करताना आपल्या भाषेचा प्रवासही जागतिक भाषा (इंग्रजी) ते स्थानिक भाषा( मराठी, गुजराती, तमिळ, उडिया इ.) असा झाला, ग्राहकांना उद्योग उत्पादनांची माहिती प्रादेशिक भाषांत मिळायला लागली तर तो प्रवास भाषिक दृष्टीनेही ‘जागतिक ते स्थानिक’ असा होईल. हे कसं होईल, तर याची दोन उत्तरं आहेत, एक वैयक्तिक पातळीवरचं आणि एक औद्योगिक. त्याआधी एक छोटं उदाहरण देते म्हणजे माझा मुद्दा नीट समजू शकेल.  आजकाल प्रवास करण्याचं प्रमाण वाढलं आहे. दक्षिण भारतातले प्रवास करताना आपण थोडं बाचकतो. तसंच जपान,कोरिया, स्वीडन, नॉर्वे सारख्या देशातही जायला लगेच धजावत नाही, कारण भाषा. बंगलोरला राहायला गेलेल्या अनेकांना तिथली भाषा समजत नाही म्हणून बरेचदा कंटाळा येतो, घरची आठवण येते. एखादा पुढे जाऊन भाषा शिकतो आणि तिथे छान बस्तान बसवतो किंवा एखादा वैतागून दिल्ली, मुंबईतली किंवा बाहेर अमेरिका-युरोपतली नोकरी बघतो. न समजणाऱ्या भाषा सतत दिसण्याचा, त्या समजून घेण्याचा, कानावर आदळण्याचा, त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा ताण खूप जास्त असतो. ज्या संस्था, व्यक्ती हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ग्राहक प्राधान्य देतात. म्हणजेच आपलं उत्तर आहे आपलं उत्पादन आपल्या ग्राहकाच्या भाषेत उपलब्ध करून देणं. एकेकाळी मोबाईल फक्त इंग्रजी भाषेतच असत, पण त्यानंतर हिंदी, मराठी भाषेत आलेल्या मोबाईलमुळे अगदी गावागावातल्या लोकांपर्यंत मोबाईल पोचला, त्यामुळे मोबाईल आणि मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या या दोन्हीचे ग्राहक वाढले. आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जसं की अमॅझोन, फ्लिपकार्ट, गुगल, मायक्रोसॉफ्ट लोकलायझेशनचं धोरण ठेवून आपली उत्पादने मराठीत आणि इतर प्रादेशिक भाषांत सादर करत आहेत. अगदी औषधाच्या बाटलीच्या सूचनाही तुम्हाला हिंदी, जपानी, थाई, आणि इंग्रजीत एकत्र दिसतील. नव्या स्टार्टअप धोरणांमुळे मोठमोठी गुंतवणूक असणारे उद्योग उभे राहत आहेत ज्यांची स्पर्धा थेट या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. त्यामुळे उत्पादनांची माहिती स्थानिक भाषांत दिली तर उत्तम दर्जासोबतच भारतीयत्व आणि त्यातही आपल्याच भाषेत दिलेली माहिती हे घटक ग्राहकांना तुमच्या उत्पादनाकडे नक्कीच आकर्षित करतील. ग्लोबल ते लोकल या प्रवासात ग्राहकाला त्याच्या भाषेतून माहिती अर्थातच लोकलायझेशन हा उत्पादन आणि ग्राहक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. बदलत्या भारतीय बाजारपेठेत उद्योगधंदे, व्यापारी संस्था यांच्या बाबतीत बहुभाषिकत्व हे या प्रकारे अपेक्षित आहे. यात उत्पादनांची प्रादेशिक भाषांत माहिती यासोबतच बहुभाषिक कर्मचारी वर्ग, कॉल सेंटर्स, वेबसाईट्स, सांस्कृतिक समज, जाहिराती, कागदपत्रे इ. बाबी समाविष्ट करता येतील. अर्थात यात उत्तम लेखन आणि डोळस भाषांतर हे कळीचे मुद्दे, पण त्यासाठी उत्तमोत्तम लेखक आणि अनुवादक सहज मिळतील.

आज अनेकजण प्रादेशिक भाषेतल्या लेखनाला, अनुवादाला दुय्यम समजतात. त्यामुळे प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्यांना मोबादलाही कमी मिळतो आणि त्यामुळे लेखकांचा इंग्रजीत काम करण्याकडे कल वाढतो. ही मोबादल्याची दरीही संपायला हवी. खरंतर प्रादेशिक लेखनामुळे तुम्हाला तुमचा आयुष्यभराचा बांधील ग्राहक मिळणे संभाव्य होईल. अशा रीतीने बहुभाषिकत्वाच एक धोरण म्हणून राबवलं तर संस्थेच्या विकासासोबतच लोकलायझेशन उद्योगालाही चालना मिळून रोजगरनिर्मिती होईल आणि भाषा संवर्धनही होईल. बोलणाऱ्याची माती विकली जाते नाही बोलत त्याचं सोनही विकलं जात नाही, बरोबर ना? म्हणजे नोकरी धंदा उत्तम करायचा तर बोलायला हवं, विचारात स्पष्टता हवी, उद्योजकता कल्पकता हवी आणि दृढ आत्मविश्वास हवा. मग भाषा कोणतीही असो, तुमचं उत्पादनच तुमच्यासाठी बोलतं. सांगण्याचा मुद्दा हा की या नव्या बदलत्या उद्योगविश्वात आपण इंग्रजीच्या पलिकडेही इतर भाषांचा मग त्या प्रादेशिक किंवा परदेशी असो विचार करायला हवा.

संस्थात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आता वैयक्तिक दृष्टीने बघू. भारतात प्रत्येक व्यक्ती ही कमीतकमी द्विभाषक आहेच. महाराष्ट्रात जन्माला आलेला माणूस मराठी, हिंदी तर आपसूक शिकतो. इंग्रजीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातून शिकली जाते. गुजराती, मारवाडी शेजारीपाजारी किंवा व्यापारी संबंध असतील तर तीही जमते. व्यापारी वर्गासाठी बहुभाषिकत्व नवीन नाही. वर्षानुवर्षे देशोदेशी, गावोगावी व्यापाऱ्यांचे तांडे फिरत, कामाच्या शोधार्थ स्थलांतर होत असे, युद्धे होत तेव्हाही स्थलांतर होत असे. यातून लोक त्या त्या प्रदेशातली भाषा आत्मसात करत. आज अनेक देश नागरिकत्व किंवा व्हिसा देताना त्या देशाची भाषा येणे अनिवार्य करतात. पण फक्त परदेशात राहण्याच्या संधी एवढाच बहुभाषिकत्वाचा फायदा नाही. विविध भाषा येत असल्याने एक उत्तम सामाजिक वर्तुळ तयार होतं जे माणसाच्या सामाजिक विकासासाठी पूरक ठरतं.

बहुभाषिकत्वाचा व्यावसायिक जीवनात काय उपयोग? सर्वसाधारपणे आपली भाषा ज्याला येते किंवा समजते त्याच्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. अशांशी व्यापारी किंवा भावनिक संबंध जोडणे, विश्वास ठेवणे माणसाला सोपे जाते, तसंच माहितीची, संदेशांची देवाणघेवाण, वाटाघाटीही सोप्या होतात आणि त्यामुळे व्यवसाय-व्यापार करणे सोपे जाते. म्हणजेच ती ती भाषा येणाऱ्या लोकांसोबत तुमच्या व्यवसायाच्या संधी वाढतात. हा मुद्दा भारतीय आणि परकीय दोन्ही भाषांसाठी सारखाच लागू. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की बहुभाषिक लोक अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतात. दूसरा मुद्दा सांस्कृतिक बुद्धिमत्ता. आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो किंवा बहुभाषिक ठिकाणी काम करतो तेव्हा नकळतपणे कोणाच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याबद्दल सहिष्णू असणं हा एक उपाय. पण आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्या प्रांताची संस्कृतीही शिकत असतो. एक छोटसं उदाहरण, एकदा माझ्या ऑफिसातल्या एक तामिळी सहकाऱ्याला मी सहज म्हणाले की तुमची लिपी सगळी जिलेब्यांसारखी दिसते तर त्याने खूपच मनाला लावून घेतलं. मला जर तमिळ येत असती तर कदाचित हा प्रसंग टळला असता.

मगाशी मी अनुवाद आणि लोकलायझेशनचा मुद्दा मांडला. यात भारतीय आणि परकीय भाषांत अनेक संधी आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आज भारतात येत आहेत, अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. यांना भारताच्या विविध प्रांतात अगदी कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी बहुभाषिक कर्मचारी वर्गाची गरज लागते. स्थानिक भाषा येणं ही अशा ठिकाणी जमेची बाजू ठरते. वरिष्ठ व्यवस्थापनातल्या लोकांनाही अनेक भाषा येत असल्याचा खूप फायदा होतो. कर्मचाऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांच्या भावना योग्य रीतीने समजावून घेता येतात, व्यावसायिक वाटाघातीतही याचा चांगला उपयोग होतो. इंग्रजी न वापरणारेही अनेक देश आहेत. या देशांतील लोकांसाठी दुभाषा म्हणून काम करूनही उत्तम पैसे कमावता येतात. अनेक कंपन्यांत दुभाषा, अनुवादक ही पदे असतात. जपानी, जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अशा भाषांत या संधी उपलब्ध असतात. लोकलायझेशनचं धोरण अनेक कंपन्या सध्या राबवत आहेत. त्यांनाही उत्तम अनुवादक आणि ती ती भाषा येणारे जाणकार आवश्यक असतात. हे लोकलायझेशन परकीय आणि भारतीय अशा दोन्ही भाषांत होते. सध्या भारतात मराठी, हिंदी, तमिळ तेलुगु पासून ते डोगरी, बोडो सोबतच अगदी हिंग्लिशमध्येसुद्धा लोकलायझेशन केले जाते. त्यामुळे प्रादेशिक भाषांतही संधी आहेत. अनुवादित पुस्तकांची बाजारपेठ मोठी आहे. मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग या क्षेत्रात सध्या अनेक भाषांवर काम चालू आहे. भाषा उत्तम प्रकारे अवगत असलेली बहुभाषिक व्यक्ती इथे उत्तम रीतीने काम करू शकते.

भारतासारख्या बहुभाषिक खंडप्राय देशात प्रादेशिक भाषा शिकण्यावरही आपण भर द्यायला हवा. शाळेत आपल्याला फ्रेंचचा पर्याय असतो आपण गुजराती, कानडी शिकायची असेल कुठलीच औपचारिक व्यवस्था उपलब्ध नाही. उलट विविध प्रांतात भाषेच्या आधारे तेढ पसरवली जाते. बहुभाषिकतेमध्ये भाषिक सौहार्द हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण जर्मनीला जायचं तर जर्मन शिकतो, मग बंगलोरला, चेन्नईला जायचं तर कानडी किंवा तमिळ शिकतो? किंवा इथे आलेला माणूस मराठी शिकतो का, त्यासाठी एखादी शासकीय व्यवस्था आहे? असे घडले तर परप्रांतात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य किती सुखकर होईल! भारताच्या भाषिक एकात्मतेसाठी हे महत्त्वाचं आहे. बहुभाषिकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आपण दर वेळी इंग्रजी-हिंदी गृहीत धरण्यापेक्षा विविध प्रांतात नोकरी धंद्यासाठी जाताना स्थानिक भाषा कामापॉरती जरी शिकली तरीही हळूहळू संपूर्ण भारतात सर्व भारतीय भाषा पसरतील. याचे आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक फायदे तुम्हाला नक्की मिळतील. व्यापारी संस्थांनीही बहुभाषिकतेचा हा नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम केल्यास त्यांना व्यवसायात यश मिळेलच पण त्याच बरोबर संतुष्ट ग्राहक आणि एक जबाबदार उद्योग म्हणून ख्यातीही वाढेल. 

रविवार, २४ जुलै, २०२२

डेक्कन कॉलेजातील लोकमान्य टिळकांचा वारसा

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्य समरातील एक युग पुरुष. ज्यांच्या केवळ लेखणीने एक मोठी क्रांती घडवून आणली, ज्यांच्या अग्रलेखांनी ब्रिटिश सरकारला धारेवर धरले आणि ज्यांच्या केसरीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

विचार करा, ज्या माणसाच्या केवळ शब्दांत एवढं बळ होतं की त्यांना घाबरून ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षे अतिशय खडतर अशा मंडाले तुरुंगात तुरुंगवासाची शिक्षा दिली, त्यांच्या बुद्धीचं तेज किती प्रखर असेल! पण ते फक्तच एक क्रांतिकारक लेखक होते का? त्यांच्या प्रखर देशप्रेमामागे एका प्रकांड पंडिताची वैचारिक बैठक होती. ते एक उत्तम वकील, तत्त्वज्ञ होते. संस्कृत, गणित आणि ज्योतिष विषयांत निष्णात होते. पण एवढी विद्वत्ता त्यांनी कशी मिळवली असेल? कुठून एवढं ज्ञान मिळवलं असेल?

या मोठ्या प्रश्नाच्या उत्तराचा एक छोटासा भाग मी माझ्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात पाहिला. त्यांनी वाचलेली ग्रंथ संपदा!


 आमच्या या कॉलेजच्या ग्रंथालयात लोकमान्य टिळकांनी स्वत: वाचलेल्या, अभ्यासलेल्या  पुस्तकांचं एक कपाट आहे.
याचं नाव आहे ‘Lokmanya Bal Gangadhar Tilak Vedic Collection’. ही पुस्तकं कॉलेजला देणगी म्हणून मिळालेली आहेत. ही पुस्तकं म्हणजे त्यांनी वाचलेल्या एकूण पुस्तकांचा एक छोटासा भाग असतील. पण त्यांची नावं आणि विषय हे एवढे मातब्बर की एवढं ज्ञान पचवायला एखादी व्यक्ती आयुष्य खर्ची घालेल. उदा. Language (Bloomfield), Original Sanskrit Text (सर्व खंड), The Saiva And Sarta Upanishada, Vedischz Mythologiz I II III, Ludwig Der Rigwed, Alt Indien, Nyay Prakash (Edgerton), The Samanya Vedant Upnishad, Secred Books of the East (F. Max Moller). 

(याच पुस्तकावरून लोकमान्य टिळकांनी आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला.)

यात ज्या पुस्तकवरून त्यांनी मंडालेमध्ये आर्यांचे मूळ वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला त्या The origin of Aryans ते पुस्तकही आहे. या आणि या कपटातील सर्व पुस्तकांना लोकमान्य टिळकांचा पवित्र हस्तस्पर्श झालेला आहे. 




  
 

आज लोकमान्य टिळकांच्या जन्मदिनी मी खरंच स्वतःला नशीबवान समजते की ते शिकलेल्या (डेक्कन कॉलेज पुणे) आणि त्यांनी स्थापन केलेल्या (बी. एम. सी. सी. डेक्कन एज्युकेशन सोसा. पुणे) अशा दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. या संपन्न वारशाबद्दल मला अभिमान वाटतो आणि त्यांचे  जीवनचारित्र, या कॉलेजची वास्तू, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची स्पंदने मला हा संपन्न वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतात.

-तेजाली चंद्रकांत शहासने


रविवार, १० जुलै, २०२२

जेव्हा मला विठ्ठल भेटला ...

चित्र - आंतरजालावरून साभार   
 

पंढरपुरी, युगे अठ्ठावीस हात कटीवर ठेवून, विटेवर उभा राहून, या विश्वाचा जगडव्याळ व्याप शांतपणे पाहत आहे पांडुरंग! कोणाचा विठू, कोणाचा विठोबा, कोणाची विठू माऊली, कोणाचा सखा पांडुरंग तर कोणाचा पंढरीनाथ... असा हा, सर्व जातीधर्म, नाती, लिंगभेद आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून या सर्व चराचराला व्यापून उरणारा पांडुरंग...आणि त्याच्या ओढीने दर वर्षी पायी वाट तुडवत पंढरपुरची वारी करणारे वारकरी. गेली आठ-नऊ शतके त्या विठू माऊलीच्या चरणाशी तादात्म्य पावत एकरूप होऊन, प्रत्यक्ष उदहरणानेच अद्वैताचे तत्त्वज्ञान सांगत, समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचे काम या वारकरी संप्रदायातील संत करत आहेत. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर विरळाच. 'एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. त्यापुढे जाऊन मी म्हणेन 'एक तरी वारी अनुभवावी'. खरंच, कधीतरी सहज एखाद्या दिंडीत एखाद्या वारकाऱ्याबरोबर चालून बघा, त्याची विठ्ठलाची ओढ एवढी की तुम्हाला त्याच्यामागे धावावं लागेल. एखाद्या माऊलीला सहज विचारून बघा, कितवी वारी मावशी? तीला कदाचित आकडा आठवणारही नाही; पण ती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भेटलेल्या विठू सावळ्याच्या गोष्टी नक्की सांगेल. कधी तो तीला शिवारात भेटला असेल, कधी बाजारात जड टोपली उचलताना कोणीतरी पुढे केलेल्या हातात भेटला असेल. कोणाला अगदीच हाता-तोंडाशी आलेलं पीक जातंय की काय झालेलं असताना बरसलेल्या पावसात भेटला असेल. कोणाला शेवटची बस निघून गेल्यावर अवचित भेटलेल्या फटफटीवाल्याच्या रूपात भेटला असेल. असा हा पांडुरंग, श्रद्धा असेल त्याला फुला-पानांत, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तो सापडतो आणि मग तो वारकरी गाऊ लागतो कांदा, मुळा, भाजी| अवघी विठा बाई माझी| लहानपणापासून ही संत परंपरा पाहत मी मोठी झाले. माझे बाबा दासबोध वाचत, आजी कलावती आईंची भजनं गात असे. पुण्यात आल्यावर पहिल्यांदा वारी जवळून पाहिली. वारकरी पाहिले. तो अफाट जनसमुदाय एकाच ओढीने पुढे जाताना पाहणं ही देखील एक वेगळीच अनुभूति होती. पण आत कुठेतरी रितं रितं वाटायचं. कधी आपल्याला भेटेल का पांडुरंग? एवढी भक्ती, एवढी ओढ आपल्यात कधी येणार? नंतर नंतर तर “आपल्याला का नाही भेटत पांडुरंग?; आपल्यालाच का नाही भेटत? तो तर केवढा साधा भोळा, थोड्याशा भक्तीनेही प्रसन्न होणारा.. मग का नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक वर्षं गेली. एके दिवशी रिकाम्या वर्ड फाईलकडे पाहत काहीतरी लिहायचा विचार करत होते. एकीकडे ‘कानडा राजा पंढरीचा... ’ वाजत होतं; काहीतरी डोक्यात होतं पण शब्दच सापडत नव्हते. त्या कल्पनेचं टोक काही हातात येत नव्हतं. काहीतरी अव्यक्त, निराकार असं डोक्यात घुमत असताना ओळी ऐकू आल्या निराकार तो निर्गुण ईश्वर| असा प्रकटला कसा विटेवर| आणि... आणि या ओळींनी माझ्या आयुष्यात युरेका क्षण आणला. अरेच्चा... एवढी वर्षं अनेक अमूर्त, निराकार कल्पना आपण शब्दांत पकडून या कागदावर, विटेवर साकार करून लिहिल्या की! जणू तो ईश्वर जो अद्वैत आहे, अमूर्त, निराकार, निर्गुण आहे, जशा माझ्या मनातल्या संकल्पना आहेत; त्याच कागदावर शब्दांच्या रूपात उमटल्यात... त्या विठू माऊलीने... पांडुरंगाने माझ्या शब्दांचं रूप घेऊन, कागदाच्या विटेवर आपले रूप प्रकट केले. म्हणजे, हा पांडुरंग आतापर्यंत मला कित्येक वेळा भेटला... वेगवेगळ्या शब्दांची रूपं घेऊन किती वेळा त्याने मला मार्ग दाखवला, मला उपदेश केला, माझी पाठ थोपटली... माऊली! कसं गं लक्षात आलं नाही माझ्या? आणि त्या क्षणी मला कर्मयोगाचा पहिला साक्षात्कार झाला. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी ही आठवण तुम्हाला सांगताना माझ्या मनाला खूप समाधान लाभत आहे. या निमित्ताने आज पुन्हा या महान संतपरांपरेचा आपण जागर करू, कर्मयोगाचा जागर करू. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! तेजाली चंद्रकांत शहासने १० जुलै २०२२

#वारी #पंढरपूर #आषाढी #आषाढीएकादशी #मराठी #विठोबा #contentwriter #contentcreation #linkedinforcreators #storytelling #मराठी #म #कर्मयोग #karma #karmayoga